महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मुंबई , नवी मुंबई, पुण्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवारी (25 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ( Supreme Court hearing today regarding municipal elections)

राज्यातील अनेक राजकीय पक्षाच्या इच्छुकांना निवडणुकीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जर सुनावणीत सकारात्मक निर्णय झाला आणि न्यायलयाने निवडणूक घेण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला तर राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर न्यायलयाने सकारात्मक निर्णय दिल्यास राज्यातील मुंबई, नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेणे शक्य आहे. राज्य आणि महापालिका निवडणूक यंत्रणा सुद्धा निवडणुका घेण्यास सज्ज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत प्रभाग रचनेतील संख्यात्मक बदल (227 ऐवजी 236 प्रभाग) यावरील अक्षेपामुळे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात व तेथून सर्वोच्च न्यायालयात गेले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेची मुदत 9 मे 2020 रोजी संपुष्टात आली होती. मात्र कोविड कालावधी व इतर कारणांमुळे ह्या महापालिकेची निवडणूक सुध्दा रखडली.

राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका मुदत संपल्यानंतर किमान तीन-चार वर्षे उलटली तरी न्यायालयीन प्रक्रिया, आक्षेप, विविध कारणास्तव रखडल्या आहेत. मात्र आता राज्यातील राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांना निवडणूक घेण्याबाबत घाई लागून राहिली आहे. मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या 25 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र तारीख पुढे 25 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. इच्छुकांची प्रतिक्षा वाढून राहिली आहे.

त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे काही याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंगळवारी न्यायालयात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांबाबत खूप महत्त्वाचा दिवस आहे. या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत सकारात्मक निर्णय दिल्यास आणि निवडणूक घेण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला तर निवडणूक मे 2025 अखेर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र जर न्यायलयाने सुनावणी काही कारणास्तव आणखीन 15 ते 20 दिवस पुढे ढकलली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या थेट ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. अखेर या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण निकालावर अवलंबून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *