नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर, शांतता राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी 
नागपूर : नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे.  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ( Nagpur is a city that loves peace and shares each other’s joys and sorrows, Chief Minister appeals to maintain peace)
औरंगजेबची कबर हटवण्यावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये  वाद होऊन तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.
 दरम्यान, महाल परिसरात झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर करत गर्दीला पांगवण्याचे काम केले आहे. जाळपोळ झाल्यानंतर गाड्यांची, दुकानांची तोडफोडही करण्यात आली. गाड्या जाळण्यात आल्या. एका गटातील काही तरुणांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केल्याने ते जखमी झाले.  दगडफेकीत काही पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
सोमवारी संध्याकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास मोठ्या संख्येने एक गट महल परिसरात पोहोचला. यावेळी या गटाने अचानक घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही दुसऱ्या बाजूने सुरुवात केली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना विभक्त केले. पण, यावेळी चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाले.
आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की, “सकाळपासून याठिकाणी आंदोलन सुरू होते. यावेळी दोन गटांमध्ये वाद झाला होता. पण रात्री महाल परिसर, तसेच आसपासच्या भागामध्ये काही बाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आहे. त्यांनी गाड्या पेटवल्या, घरे जाळली आहेत. यावेळी बाहेरच्या लोकांनी येऊन मुद्दाम काही कुटुंबांना टार्गेट केले आहे. सध्या पोलीस हे आंदोलन नियात्रणात आणण्याचे काम करत आहेत,”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *