विशेष प्रतिनिधी
मुंबई :क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. (Proposal to confer Bharat Ratna on Mahatma Phule, Savitribai Phule unanimously approved in the Legislative Assembly)
याबाबतचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला. भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिला.
भुजबळ यांची समजूत घालताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांना मिळालेली महात्मा ही पदवी त्यांच्या लोकमान्यतेचे द्योतक आहे. त्यांची महात्मा पदवी कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही. भारतरत्न प्रस्ताव हा जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडून राज मान्यता मिळावी यासाठीचा प्रयत्न आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
देशवासीयांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधिमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू करून स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत.
देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला, घेतलेल्या कष्टाला आहेत. समाजातील दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दोघांनी केलेले कार्य अलौकिक आहे. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासीयांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १२ मार्च रोजी या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता. मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेल्या भावना हा या राज्य सरकारच्या भावना आहेत. फुले दाम्पत्य हे देशासाठी नव्हे तर जगासाठी एक मार्गदर्शक आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासंदर्भात पुढील आठवड्यात विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला अशासकीय ठराव शासकीय ठराव म्हणून मांडण्यात येईल, असे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज ठराव मांडून मंजूर करण्यात आला.
