विशेष प्रतिनिधी
मुंबई :आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. देशाच्या यंत्रणांवरून विश्वास उठला पाहिजे, अशी कामं करणाऱ्यांना सोडणार नाही.
सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे करून गद्दार अशी टीका करणाऱ्या कुणाल कामरा याच्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला ( Those who speak on the basis of someone else’s words will be taught a lesson, warns Chief Minister Devendra Fadnavis)विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यावर कविता करा, आम्ही टाळ्या वाजवू. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर कारवाई केली जाईल. या गोष्टी या महाराष्ट्रात सहन करणार नाही. काहीही झालं तरीही विनाकारण प्रसिद्ध मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. स्टॅण्डअप कॉमेडी आम्हाला आवडते, त्याला दादही देतो. अलहाबादियालाही आम्ही सोडलं नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही कितीही दबाव आणला तरी कारवाई होईल. डाव्या विचारसरणीचे किंवा अर्बन नक्षल म्हणा, समाजातील मानकांना अपमानित करणं, देशातील संस्थांना अपमानित करणं, देशाच्या यंत्रणांवरून विश्वास उठला पाहिजे, अशी कामं करणाऱ्यांना सोडणार नाही.
वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाचा विनोद करण्याचा प्रयत्न केला. कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीने सांगून दिलं की कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही व्यंग करा, पण अपमानित करण्याचा काम कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. कामरांनी माफी मागितली पाहिजे, ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यांवर अतिक्रमण करता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
