विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘X’ वर लिहिले, #OperationSindoor on the games field. Outcome is the same – India wins! Congrats to our cricketers. (खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच – भारत विजयी! आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा.” ( Operation Sindoor on the field too the result is the same – India winsPrime Minister Modi praises the Indian team)
मे महिन्यात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर हवाई मोहिमेचा अप्रत्यक्ष संदर्भ देत मोदींनी म्हटले की रणांगणावर असो वा क्रिकेटच्या मैदानावर, भारत विजय मिळवतोच. या विधानाने चाहत्यांमध्ये उत्साह आणि राष्ट्रीय अभिमानाची लाट उसळली.
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताचा डाव सुरुवातीला डळमळीत झाला. पण मधल्या फळीतील तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी जबाबदारी घेतली. तिलक वर्माने संयमी अर्धशतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया रचला. सॅमसन व दुबे यांनी महत्त्वपूर्ण साथ देत पाकिस्तानच्या गोलंदाजीला रोखले.अखेर भारताने १४६ धावांचे लक्ष्य गाठले आणि देशभर जल्लोष सुरू झाला.
सामन्यानंतर देशभरात फटाके, घोषणाबाजी आणि जल्लोषाचे दृश्य दिसले. सोशल मीडियावर #OperationSindoor आणि #IndiaWins हे हॅशटॅग ट्रेंड झाले. दिल्लीतील एका चाहत्याने विनोदी टिप्पणी केली, “पहिले आपण सिंदूर लावला आणि आता तिलक लावला.” यामधून त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि तिलक वर्माच्या विजयी खेळीचा छान संदर्भ जोडला.
भारत-पाक संबंध तणावपूर्ण असतानाच या सामन्यावरून ‘खेळ आणि राजकारण वेगळे ठेवावे का?’ हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला होता. अनेक विरोधी नेत्यांनी पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र भारतीय संघाच्या विजयाने आणि पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेवर पडदा पडल्यासारखे झाले.
या विजयाने भारताने दुसरा टी-२० आशिया कप आणि एकूण नववा आशिया कप किताब पटकावला आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिक्रियेमुळे हा विजय फक्त क्रिकेटपुरता न राहता राष्ट्रीय अभिमानाचा क्षण ठरला आहे.
