विशेष प्रतिनिधी
पुणे : निलेश घायवळ याने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले, असा दावा करतानाच निलेशच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. राजकारणी लोक त्याला फसवतात. त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात, असा दावाही निलेश घायवळच्या आईने केला. ( Nilesh Ghaywal is a victim of politics oppositions conspiracy to prevent him from entering politics claims mother)
कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदाविरोधी कायद्यानुसार (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून निलेश घायवळ हा विदेशात पळून गेल्याचे समोर आले आहे.
निलेश घायवळची आई कुसुम घायवळ यांनी मोठाएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोष सोडले आहे. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे निलेशने मला सांगितले होते. त्यानुसार, गेल्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. दोन्ही भावांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा होती, असा दावा निलेश घायवळच्या आईने केला.
कुसुम घायवळ म्हणाल्या, माझ्या मुलाला (निलेशला) राजकारणात प्रवेश करायचा होता. तो नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. मात्र, निलेशने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले. निलेशला राजकारणाचे वेड आहे. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्यांची आई आहे, त्यामुळे खोटं बोलणार नाही. त्या दोघांनी पळून जावे किंवा आपल्या मुलाने एखाद्याचा खून करावा, असे कोणत्या आईला वाटते? पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षांपासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचे ठरवले असून सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण राजकारणी लोक त्याला फसवतात, त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात.
