गेल्या एक वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे, आणि या एक वर्षात महाराष्ट्रात विकासाचे नामोनिशाण दिसत नसताना, महाराष्ट्रातील लोकांचे हाल नक्कीच होत आहेत. हे सरकार केवळ सत्तांध आणि स्वार्थी सरकार आहे, असे परवाच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन स्पष्ट झालेलंच आहे, मात्र आता शिवसेनेत आणखी एक नवीन घडामोड होताना दिसतेय, ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिची शिवसेनेत एंट्री. या घटनेवरुन सामान्य जनतेला मात्र ‘शिवसेनेचे इतके वाईट दिवस आलेत का?” असेच वाटतेय.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर कांग्रेस पक्षाकडून लढली. त्यावेळेला संपूर्म मीडिया समोर येऊन, रोड शो करत भारतीय जनता पक्ष कसे हिंदुत्ववादी आहे, आणि महाराष्ट्रात आणि देशात भाजप मुळे धार्मिक तेढ कशी निर्माण झाली आहे, याविषयी तिने अगदी हिरिरिने भाष्य केले होते, ज्यातले एकही वाक्य तथ्याला धरून नव्हते. या निवडणुकीत उर्मिला ला जबरदस्त पराजय स्वीकारावा लागला. आणि त्यानंतर काहीच दिवसात तिने काँग्रेस पक्षाला ‘अच्छा’ केले होते. मात्र ती पन्हा एकदा राजकीय वर्तुळात उतरेल ते ही शिवसेनेच्या माध्यमातून असा विचार कदाचित कुणी केला नव्हता.
आता राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर शिवसेनेचे बॉलिवुड कनेक्शन तसे जुने आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र अशा प्रकारे उर्मिला मातोंडकर ला आपल्या पक्षात घेणे आणि जी व्यक्ति हिंदुत्वाबद्दल खुलून नकारात्मक बोलते अशा व्यक्तिला आपल्या पक्षाचा हिस्सा करून घेणे, शिवसेनेसाठी अतिशय केविलवाणे आणि लाजिरवाणे आहे. एकूणच शिवसेनेला गळती लागलेली आहे, त्यांचे रूप जनतेच्या समोर आले आहे, असे असताना, स्वत:च्या बचावासाठी शिवसेना असे निर्णय घेत असेल तर मात्र नजिकच्या भविष्यात शिवसेनेचे काही खरे सांगता येत नाही.
उर्मिला मातोंडकर हिने काश्मीर येथील व्यवसायी मोहसिन अख्तर याच्याशी लग्न केल्यानंतर ती चर्चेत होती. लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन या सर्व विषयांवर कणखर भूमिका घेणारी शिवसेना आज अजान प्रतियोगिता घेतेय, उर्मिला मातोंडकर सारख्या पूर्णपणे विरुद्ध विचारसरणीच्या व्यक्तिला आपल्या पक्षात सामिल करून घेणे, आणि एकूणच शिवसेनेच्या विचारणसरणीच्या अगदी विरुद्ध काम करत आहे. आजवर महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला प्रेम दिलं, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसासाठी असलेल्या प्रेमामुळे, त्यांच्या हिंदुत्वासाठी असलेल्या कणखर मतांमुळे, त्यांच्या बाणेदार पणामुळे मात्र बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली. आताची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर असलेली शिवसेना आहे, आणि यासारखी दुसरी शोकांतिका नाही.
