
हे सरकार कांगावाखोर सरकार आहे. स्वत: अन्याय करायचा आणि मग आमच्यावर अन्याय झाला असा कांगावा करणार, असे या सरकारचे धोरण आहे. आमच्या नेत्यांनर या सरकारने बिनबुडाचे आरोप केले आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्या नेत्यांना अर्ध्या रात्रीतून अटक करण्यात आली आहे. नारायण राणे, नितेश राणे याची उदाहरणं आहेत. आणि आता दाऊदसोबतचे संबंध समोर आल्यावर, आमच्यावर अन्याय झाला आहे, असा कांगावा हे सरकार करत आहे. या सरकारचे एक ब्रीदवाक्य आहे, “महाराष्ट्र झुकणार नाही.” पण हे सरकार विसरतंय कि, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. 12 कोटी महाराष्ट्राचे नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे, आणि हो महाराष्ट्र झुकणार नाही, मात्र तुमच्या सारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र नक्की झुकवेल.” असे खणखणीत वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पत्रकारांशी झालेल्या संवादात ते बोलत होते.
दाऊद इब्राहिम सोबत नवाब मलिकांच्या व्यवहारामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीकास्त्र सोडत आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक राजीनामा देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यावर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. “1993 च्या बॉम्ब विस्फोटांच्या जख्या अजूनही ताज्या आहेत. नवाब मलिक आणि दाऊद यांच्यात झालेल्या या व्यवहारानंतर आणखी तीन बॉब्म विस्फोटाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. राष्ट्रदोह्यांसोबत व्यवहार करण्यासारखा मोठा गुन्हा दुसरा कुठला नाही. नवाब मलिक यांनी मुंबईच्या हत्याऱ्यांसोबत व्यवहार केला आहे. त्यांच्यापर्यंत हा काळा पैसा पोहोचल्यानंतर मुंबईत तीन बॉम्ब विस्फोट झाले आहेत. अशा व्यक्तिच्या पाठीशी सरकार का उभे आहे?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
“नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यामागे, सरकार एका विशिष्ट समाजाला खुश करण्याच्या प्रयत्नात आहे, असे समोर आले आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी आणि एकूणच सरकार नवाब मलिकांना पाठीशी घालत आहे, यातून सरकारचे आणि राष्ट्रवादीचे चरित्र समोर येते. या महाराष्ट्रात आता सरकार विरोधात बोलणाऱ्या माणसावर हल्ले होतात, आणि दाऊद सारख्या मुंबईच्या हत्याऱ्यासोबत व्यवहार करणाऱ्याला पाठीशी घातले जाते. आपण असवैधानिक कृति करायची आणि अपेक्षा करायची कि राज्यपालांनी ही कृति मान्य करावी, हे चुकीचे आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
एकूणच नवाब मलिक प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळले आहे. आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातून मुख्यमंत्री गंभीर विषयांवर भाष्य न करता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून “साबुदाणा भिजत घालायला विसरू नका” अशी गंमतशीर सूचना करतात, तेव्हा मात्र या महाराष्ट्रात काय सावळा गोंधळ सुरु आहे, आपल्या महाराष्ट्राची धुरा ज्याच्या हाती आहे, तो व्यक्ति योग्य आहे का नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांचा राजीनामा समोर येतो का ? त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते आणि सरकारची भूमिका पुढे काय असेल? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
