भारतीय जनता पक्षासोबत असलेली युती तोडून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. आघाडी सरकारचे शिल्पकार त्यांना म्हटले जायचे. मात्र आता पक्ष हातातून गेल्यावर एकटे पडलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनीही वाऱ्यावर सोडले आहे.पक्षाच्या विचारधारेशी द्रोह केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतील बहुतांश साथीदार त्यांना सोडून गेले. बहुमत असल्यामुळे एकनाथ शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे.
आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या इतर आमदारांच्या आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमक्या या कठीण प्रसंगी शरद पवार यांनी त्यांचा हात सोडला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणालेशिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही. मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे.वास्तविक राज्यात सरकार असताना कोणताही पेचप्रसंग निर्माण झाला की शरद पवार शिष्टाई करायचे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आहेत. मात्र आता संकटाच्या प्रसंगी त्यांनी हात बाजूला केल्याने उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
