जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.
आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढे नेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत. समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
