गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, निती आयोगाचं आवाहन

देशात प्रथमच संसर्गजन्य H3N2 इन्फ्लूएंझामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार सतर्क झाले आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील 82 वर्षीय व्यक्ती आणि हरियाणातील जिंद येथील 56 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना रक्तदाबासारखे आजार होते. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.

हा इन्फ्लूएंझा विषाणू आहे ज्यामुळे श्वसन संक्रमण होते. WHOच्या मते, H3N2 हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. इन्फ्लूएंझा विषाणू हवेत वर्षभर राहत असला तरी हवामानातील चढउतारांमुळे त्याची तीव्रता वाढते. H3N2 संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, ताप, जुलाब, उलट्या आणि अंगदुखीच्या तक्रारीही आहेत.