विरोधी पक्षांकडून आरोपांची राळ उठविली जात असली तरी जनता त्यांना काडीचीही किंमत देत नाही हे स्पष्ट झाले आहे. देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तरी भाजप तीनशेपार जाणार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे.
टाईम्स नाऊ, नवभारत आणि ईटीजी रिसर्चने हे सर्वेक्षण केले आहे. यातून त्यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज या सर्वेक्षणातून घेण्यात आला. त्यावर देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे समोर आले दिले. या सर्वेक्षणात देशभरातून ९० हजार लोकांनी सहभाग घेतला. देशात आता निवडणुका झाल्या तर पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा स्पष्ट संदेश या सर्वेक्षणात लोकांनी दिला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला विरोधकांच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही. त्याच वेळी ५१ टक्के लोक मोदी सरकार-२ च्या कामावर समाधानी आहेत, अशी माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
या सर्वेक्षणातून वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपा आणि मित्र पक्षांना २९२ ते ३३८ जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना १०६ ते १४४ जागा मिळतील. तृणमूल काँग्रेसला २० ते २२ जागा मिळतील. तर इतर पक्षांच्या खात्यात ६६ ते ९६ जागा जातील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. सर्वेक्षणात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत, असे विचारले गेले. तर यावर ५१ टक्के लोकांनी ते सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे. २१ टक्के त्यांच्या कार्यशैलीवर खूश नाहीत, तर १६ टक्के लोकांनी ते बर्याच प्रमाणात समाधानी असल्याचे सांगितले. तर १२ टक्के लोकांनी ते सरासरी असल्याचे सांगितले.
आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही भाजप आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. भाजपा आणि मित्र पक्षांना ३८.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना २८.७ टक्के मते मिळतील. इतर पक्षांच्या खात्यामध्ये ३३.१ टक्के मते जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वात प्रबळ चेहऱ्याबाबत या सर्व्हेमध्ये विचारणा केली असता त्यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वरचढ असल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने ६४ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये आपला कल नोंदवला. तर १३ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली. नितीश कुमार यांना ६, केसीआर यांना ५, तर अरविंद केजरीवाल यांना १२ टक्के लोकांनी पसंती दिली.
तर २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल याबाबत विचारणा केली असता २९ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली. तर १३ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी, १९ टक्के लोकांनी केजरीवाल तर ७ टक्के लोकांनी केसीआर आणि ८ टक्के लोकांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे. २०२४ मध्ये भाजपा पुन्हा एकदा ३०० जागा जिंकणार का, असा प्रश्न विचारला असता ४२ टक्के लोकांनी भाजपा ३०० हून अधिक जागा जिंकेल, यात कुठलीही शंका नसल्याचे सांगितले. तर २६ टक्के लोकांनी भाजपाला ३०० जागा जिंकणे कठीण जाईल, असे सांगितले. तर १९ टक्के लोकांनी याबाबत निवडणुकीच्या वेळीच कळेल, असे सांगितले.
