रेणापूर येथील गिरिधारी तपघाले यांची हत्या झाली. या प्रकरणात गुन्हा नोंदविताना पोलिसांची कर्तव्य तत्परता दिसून न आल्याने पोलीस निरीक्षक यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यातील तिघांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर तिघांना निलंबित केले आहे. मात्र या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रेणापूर येथे जाऊन तपघाले कुटुंबियांची गुरुवारी (दि.15) रामदास आठवले यांनी भेट घेतली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तपघाले कुटुंबाला दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी काही रक्कम यापूर्वीच देण्यात आली होती. उर्वरित मदत निधी रामदास आठवले यांच्या हस्ते तपघाले कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.
तीन हजारांच्या कर्जापोटी सावकारासह इतरांनी जबर मारहाण करीत गिरीधारी तपाघाले यांचा खून केल्याची घटना रेणापूर येथील राजेनगर येथे घडली होती. या प्रकरणात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रेणापूरचे पोलीस निरीक्षक डी. डी. शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यातील तिघांची नियंत्रण कक्षात बदली, तर तिघांना निलंबित केले.
रामदास आठवले म्हणाले, गिरिधारी तपघाले यांचा खून जातीयवादातून करण्यात आला आहे. तपघाले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तपघाले कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घ्यावे. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. तपघाले कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू असेही आठवले यांनी सांगितले
