सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर?

राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील सगळेच महत्त्वाच्या पक्षांकडून यावर आरोप-प्रत्यारोप सुरू होते.एकीकडे राज्यात अशी राजकीय परिस्थिती असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक घडामोड घडतेय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हळुवारपणे राज्याच्या राजकारणात एन्ट्री करतायत. सुरुवातीला नांदेड आणि आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर,नागपूर तसेच सोलापूर व पश्चिम महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे नेते के सी आर यांच्या गळाला लागले आहे. विशेष म्हणजे बीआरएस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यात आता यावर्षीच्या आषाढी वारीला राजकीय रंग चढणार आहे. कारण महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरसावलेले बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत.

सध्या के चंद्रशेखर राव राज्यात आपल्या पक्षाची पायमुळ घट्ट करण्यासाठी झपाट्याने सभा आणि पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे आपल्या अब की बार किसान सरकार या घोषणे प्रमाणे थेट विठूरायाच्या पंढरीमध्ये जात वारकऱ्यांना भेटणार आहेत. 27 जूनला के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. तर आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 28 जूनला पंढरपूरला जाणार आहेत.

यावेळी के चंद्रशेखर राव वारकऱ्यांसी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून पुण्यापासूनचे सर्व पालखी मार्ग आणि पंढरपूरमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. दरम्यान चर्चा आहे ती सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यांना पक्षात घेऊन केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमका करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भालकेंसह या 10 माजी आमदारांनी हैदराबाद दौरा केला होता.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला असल्यास देखील सांगण्यात आलं होतं. भालके यांच्या हैदराबाद दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आल्याने ते प्रवेश न करताच माघारी फिरले असल्याचे सांगितले जात होते.

केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याहून हैदराबाला येण्यासाठी पक्षाचे खास विमान पाठविले होते. याच विमानाने ते हैदराबादला रवाना झाले होते. त्यामुळे आता भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्ष प्रवेशाच्या चर्चांदरम्यान बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे हा पक्षप्रवेश आताच होणार का? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे.