सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आज पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळपासूनच नोकरी करणार्‍या तरुणांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असं आवाहन करतानाच त्यांनी विरोधकांनाही जबरदस्त टोला लगावला आहे. त्याचबरोबर राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या, त्या दूर झाल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत. त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांवर केली.

⁠फतवे काढणे ही आश्चर्यकारक आहे, असं घडणं चुकीचं आहे. विकास आम्ही करतोय. कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करतायेत. जे 50-60 वर्षे काँग्रेसला करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी केले. युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे. त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. युवकांनी बाहेर येवून मतदान करावे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं.

ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे. ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांची तोंडं फुटतील, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.