शेतकऱ्यांना दोन वर्षे कर्जमाफी नाहीच, अजितदादा म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही

विशेष प्रतिनिधी

पुणे : आर्थिक शिस्त गरजेची असते. मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करतात येतात पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे कर्जाचे पैसे भरा. या वर्षी आणि पुढच्या वर्षीही कर्जमाफी होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. ( No loan waiver for farmers for two years Ajitdada said money cannot be disguised)

अजित पवार म्हणाले, काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातील जनतेला सांगतो 31 मार्चच्या पूर्वी कर्जाचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात येत नसते. आता तशी परिस्थिती नाही. भविष्यातील परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीही कर्जमाफी होणार नाही. तशी आपली परिस्थिती नाही.
अजितदादा म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची होती, ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करतात येतात पैशाचे सोंग करता येत नाही.”

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्याबद्दल बोलताना अजितदादांनी म्हटले, “माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ओळख आहे, हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आले असेलच. केंद्रात काम असेल तर आपल्याकडून होणार, राज्यात काम असेल तर आपल्याकडूनच होणार… सहकार खात्यात काही काम असेल, तर आपल्याकडून होणार… पण, अन्य लोकांचं तसे नाही. कारखान्याच्या इन्कम टॅक्स फक्त अमित शहा यांच्यामुळे निघाला. भावनिक होऊ नका. हे आधीच्या काळात का झाले नाही?”