तुमची भूमिका पाहून बाळासाहेबांना दुःख झाले असते, वक्फ सुधारणा विधेयकावरून श्रीकांत शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ठाकरे गटाच्या लोकांनी त्यांच्या आत्म्यास विचारावे की, आज बाळासाहेब असते तर ते इथे हे भाषण देऊ शकले असते का? वक्फ सुधारणा विधेयकावर तुमची भूमिका पाहून बाळासाहेबांना दुःख झाले असते, असा हल्लाब शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर केला. ( Balasaheb would have been saddened to see your stanceShrikant Shinde attacks Thackeray group over Waqf Amendment Bill)

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले वक्फ सुधारणा विधेयक आज संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत सादर केले. यानंतर चर्चेदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधेयकात काही चूक असेल तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका मांडली. त्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देत आहे. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम 370, तिहेरी तलाक, नंतर सीएए आणि आता गरिबांच्या कल्याणासाठी वक्फ सुधारणा विधेयक या सभागृहात आणले गेले आहे. परंतु या विधेयकाबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे भाषण ऐकून मला खूप वाईट वाटले. परंतु ठाकरे गट कोणाच्या विचारसरणीचे पालन करत आहे आणि या विधेयकाला विरोध करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे त्यांच्या चुका सुधारण्याची, त्यांचा इतिहास पुन्हा लिहिण्याची आणि त्यांची विचारसरणी जिवंत ठेवण्याची सुवर्णसंधी होती. पण ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची विचारसरणी आधीच संपुष्टात आणील आहे. त्यामुळे आज जर बाळासाहेब इथे असते आणि त्यांनी ठाकरे गटाची विरोधाची भूमिका पाहिली असती तर त्यांना दु:ख झाले असते, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.

शिंदे म्हणाले , हे विधेयक देशातील गरीब मुस्लीम समाजाच्या हितासाठी आहे. मात्र विरोधकांची भूमिका “हिंदूविरोधी आणि नवाब- जमीनदारांच्या मालमत्तांचे रक्षण करणारी हे विधेयक गरीब मुस्लीम नागरिकांच्या कल्याणासाठी आहे. ठाकरे गटाचा विरोध पाहता असं वाटतं की त्यांना हिंदूंविषयी अ‍ॅलर्जी आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की या विधेयकामुळे कोणत्याही विद्यमान मालमत्तेला धोका नाही. तरीही, विरोधकांकडून दिशाभूल करणारे आरोप सातत्याने करण्यात येत आहेत. खोट्या माहितीच्या आधारे जनतेला गंडवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

इतिहासातही वक्फ मंडळांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधताना ते म्हणाले काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या कारकिर्दीत वक्फ मंडळांतील गैरव्यवहारांविरोधात अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता. काँग्रेस सरकारने २०१३ निवडणुकीपूर्वी घाईघाईत १२३ मालमत्ता अधिसूचित केल्या होत्या,” त्यामुळे काँग्रेसच्या हेतूंवरच शंका आहे.

वक्फ मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नात फारशी वाढ झाली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. “या मालमत्तांचा प्रभावी उपयोग होणं आवश्यक आहे. हे पाऊल केवळ मुस्लीम समाजाचं सशक्तीकरण करण्यासाठी नाही, तर त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आहे,” असं स्पष्ट करत श्रीकांत शिंदे यांनी सरकारच्या धोरणांची जोरदार पाठराखण केली.

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत आपली भूमिका मांडताना अरविंद सावंत म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकावर मी जेपीसीचा सदस्यही होतो. दुर्दैवाने, जेपीसीमध्ये शेवटपर्यंत याबाबत चर्चा झाली नाही. जेपीसीमध्ये गैर-भागधारकांनाही बोलावण्यात आले. आम्हाला नेहमीच असे वाटत आले आहे की, तुमच्या (भाजपा) करनी आणि कथनीमध्ये खूप फरक आहे. या विधेयकाद्वारे तुम्हाला कोणासोबतही न्याय करायचा नाही. तुम्हाला आता फक्त बिहारच्या निवडणुका दिसत आहेत. त्यामुळे या विधेयकात जर काही चूक असेल तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही.