विशेष प्रतिनिधी
सांगली : जयंतरावांचे तळ्यात-मळ्यात आहे. त्यांना कुठे जायचे नक्की नाही. पण, जयंत पाटलांचा एक अजेंडा मोठा आहे, मग ते कुठेही जाऊदे, मी, सदाभाऊ खोत आणि पृथ्वीराज देशमुख यांच्याविरोधात ताकदीने लढायचे. जयंत पाटलांना गट, पक्ष आणि विचारधारा नाही, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ( Jayant Patil has no group party or ideology says Gopichand Padalkar)
खानापूर तालुक्यातील विटा येथे जत विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल तसेच सातत्याने पाठपुरावा करून शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर तालुक्यात मंजूर केल्याबद्दल पडळकरांचा नागरी सत्कार समारंभ झाला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे.लोकांना सोबत घेऊ, नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवू. सांगली जिल्ह्यात पक्षाचा झेंडा रोवू.
सदाभाऊ खोत म्हणाले, सांगलीतील दुष्काळी भागासाठी गोपीचंद पडळकर यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला. खानापूर, आटपाडी, जतसारख्या दुष्काळी भागात गोपीचंद पडळकरांनी पाणी आणण्याचे काम केले. योद्धा रणांगणात हार पत्करत नसेल, तर त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते. काही फुटकी लोक सोशल मीडियात पडळकरांना बदनाम करतात. कुठे भांडणामध्ये मंगळसूत्र तुटले, तर पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणतात, अरे, गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही, तर मंगळसूत्राचे रक्षण करणारा आहे.”
“पृथ्वीराज देशमुखांनी म्हटले, ‘गोपीचंद पडळकर हे तरूण असल्याने मंत्री झाले नाहीत.’ मग मी तर म्हातारा होतो ना? मला तरी मंत्री करायला पाहिजे होते. पुढेही आमचीच सत्ता असणार आहे. पृथ्वीराज देशमुख हे खासदार होतील. मीही खासदार होईन. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील. मला कुठेतरी राज्यपाल करा. नाहीतर आमचे बॅण्ड वाल्यासारखे व्हायचे… बॅण्डवाल्याचे कसे असते, चांगले वाजवायला लागले की शेजारी असणारे सर्व म्हणतात, ‘वन्स मोर…’,” असेही खोत म्हणाले.
