विशेष प्रतिनिधी
रायगड: छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खरेतर त्यांना टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. परंतु आपण लोकशाही राहतो. त्यामुळे त्यासंदर्भात नियम तयार करण्याचे काम करण्यात येईल.
( Lets make a law but those who insult Chhatrapati should be thrown from the top of the hill says the Chief Minister)
छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावरुन घोषणा करताना म्हणाले, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजे यांनी काही मागण्या केल्या. छत्रपतींचा अपमान करताना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खरेतर त्यांना टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. परंतु आपण लोकशाही राहतो. त्यामुळे त्यासंदर्भात नियम तयार करण्याचे काम करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रमाण इतिहास राज्य शासन करणार आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात आला आहे. आम्ही उच्च न्यायालयात या प्रकरणी लढा देऊन स्मारक उभारण्याच्या मागणीत यश मिळवू.
छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत का आहेत? त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज असताना देशात आदिलशाही, मोघलाई, कुतबशाही होती. परकीय आक्रमकांचे राज्य कधीच संपणार नाही, असे वाटत होते. सर्वत्र अंधकार झाला होता, असे वाटत होते. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला. शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीच नसतो. कारण आपल्यातील तेज जागवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. आठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्यामधील तेज जागृत केले. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. संपूर्ण भारतात केवळ शिवाजी महाराजांमुळे भगव्याचे राज्य आले.
