भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित; बीसीसीआयचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बीसीसीआयने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले. ( IPL postponed indefinitely due to India-Pakistan tensionsBCCI’s big decision)

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन होत असून, ड्रोनद्वारे हल्ले आणि प्रत्यक्ष गोळीबार सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील मोठ्या शहरांमध्ये IPL सामने खेळवताना प्रेक्षक, खेळाडू आणि आयोजक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता.

गृह मंत्रालयाच्या सुरक्षा अहवालात IPL सामने हे “उच्च जोखीम असलेले सार्वजनिक कार्यक्रम” म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर BCCI आणि केंद्र सरकारदरम्यान उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहमंत्री अमित शहा आणि BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यात विस्तृत चर्चा झाली होती.

“देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हित सर्वात प्रथम आहे. सध्या निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीमुळे IPL चे उर्वरित सामने पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. क्रिकेट चाहत्यांच्या संयमाची आम्ही अपेक्षा ठेवतो,” असे BCCI ने X (पूर्वीचे ट्विटर) वरून स्पष्ट केले आहे.

IPL मधील अनेक परदेशी खेळाडूंनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या देशांमध्ये परतण्याची तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियन, इंग्लिश आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळांनी त्यांच्या खेळाडूंशी संपर्क साधत तातडीची माहिती मागवली आहे.

IPL स्थगित झाल्याने प्रायोजक, ब्रॉडकास्टिंग राईट्स, फ्रँचायझी आणि जाहिरातदार यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अंदाजे १५,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता BCCI च्या अंतर्गत अहवालात नमूद करण्यात आला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडूनही प्रतिहल्ल्याची शक्यता वर्तवली जात असून, देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे IPL च्या पुढील आयोजनाबाबतचा निर्णय देशातील लष्करी व राजकीय परिस्थितीच्या स्थैर्यावर अवलंबून राहणार आहे.