दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी आदित्य ठाकरे गट प्रयत्नशील, नितेश राणे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

कणकवली : दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील आहे, याची माहिती संजय राऊत का देत नाही? असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
( Aditya Thackeray group is trying to prevent both Thackerays from coming together claims Nitesh Rane)

मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याची संजय राऊत यांची घाणेरडी सवय आहे. दोन्ही पवार एकत्र कधी यायचे ते ठरवतील. मात्र, दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी मातोश्रीचा कुठचा माळा काम करतोय याची थोडी माहिती संजय राऊत यांनी द्यावी.
नितेश राणे म्हणाले की, “जयंत पाटील यांची जागा रोहित पवार यांना घ्यायची होती. त्यामुळे रोहित पवार यांचं हे षडयंत्र असू शकतं. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर लढायच्या? याचा निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतील त्यावर कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू.

अभिनेते शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, जी व्यक्ती अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट काढून खिसे भरतात, मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर साधं ट्विट पण कोणाला वाचायला मिळालं नाही. एवढा मोठा हल्ला पाकिस्तानने केला तेव्हा यांचं पाकिस्तानचं प्रेम उफाळून आलं असेल. यांना आपलं देशप्रेम दिसत नसेल तर यांना आपण त्यांचे चित्रपट बघून मोठे का करावे?”