हा मराठीचा विजयोत्सव नव्हता तर उध्दव ठाकरेंची रुदाली, मुख्यमंत्र्यांनी काढले वाभाडे

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले, अशा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या असे म्हटले गेल्याचा टोला त्यांनी लगावला. ( This Was Not a Celebration of Marathi Pride But Uddhav Thackerays Mourning Ritual – CM Takes a Jibe)

पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुळात मुंबई महापालिका 25 वर्षे उध्दव ठाकरे यांच्या ताब्यात होती. त्यानंतरही त्यांना दाखवण्यासारखे एकही काम करता आले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. उलटपक्षी आम्ही बीडीडी चाळीतील मराठी माणसांना, पत्राचाळीतील मराठी माणसांना, अभ्युदय नगर येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी हक्काचे मोठे घर दिले. याची असुया त्यांच्या मनामध्ये आहे.

राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर करत मुख्यमंत्री म्हणाले, मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले,
ये पब्लिक है सब जानती है. त्यामु्ळे मुंबईतील मराठी असो की अमराठी माणूस असो, सर्वच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.