विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचा गौरव व अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरूवारी विधानसभेत केली.( Ganeshotsav is now a festival of the state of Maharashtra announced by Cultural Affairs Minister Ashish Shelar)
विधानसभा सभागृहात बोलताना आशिष शेलार
म्हणाले की,देशात व जगात गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती व प्रचार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला. या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. हा महोत्सव सध्याही त्याच पद्धतीने चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करीत आहे.
देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयांत जरूर केला. पण मला या ठिकाणी मुद्दामहून उल्लेख करायचा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने या सगळ्या निर्बंधांना दूर करून मार्गात आलेले स्पिड ब्रेकर बाजूला करण्याचे काम अतिशय शीघ्रतेने केले, असे शेलार यांनी सांगितले.
पीओपीच्या पारंपरिक मूर्त्यांवर बंदी आणताना सीपीसीबीच्या गाईडलाईन्सचा तत्कालीन सरकारच्या काळातल्या सरकारने बाऊ केला. त्यानंतर पीएपी मूर्त्यांच्या बाबतीमध्ये पर्यावरण पूरक अन्य पर्यायांना समोर ठेवून पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतली. राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा अहवाल घेतला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मूर्त्या बनवणे, डिस्प्ले करणे व विकणे यालाही परवानगी मिळाली, असे आशिष शेलार म्हणाले.
गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलिस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल, त्यासाठी लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की आपण जे वेगवेगळे देखावे करतात त्यामध्ये आपले सैन्य, सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
