म्यानमारमध्ये भारतीय लष्कराचा सर्जिकल स्ट्राइक; उल्फा च्या छावणीवर शंभर ड्रोनद्वारे अचूक हल्ला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तरपूर्व भारतात अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटांना लक्ष्य करत भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेलगत मोठी कारवाई केली आहे. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) या दहशतवादी संघटनेच्या छावणीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुमारे 100 ड्रोन वापरून अचूक हल्ला करण्यात आला. लष्कराच्या या ऑपरेशनमुळे ULFA च्या ढासळलेल्या नेटवर्कवर मोठा आघात झाला आहे. ( Indian Armys surgical strike in Myanmar100 drones accurately attack ULFA camp)

ही कारवाई अत्यंत नियोजनपूर्वक आणि गुप्ततेने पार पडली. ड्रोनद्वारे अतिरेक्यांच्या हालचालींवर आधीपासून लक्ष ठेवले जात होते. योग्य वेळ साधून म्यानमारमधील घनदाट जंगलात लपलेल्या त्यांच्या छावणीवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ही कारवाई केवळ ULFA वर मर्यादित नाही. यामागे भारतविरोधी परकीय शक्तींचा, विशेषतः चीनचा, अप्रत्यक्ष हात असल्याचा संशय याआधी गुप्तचर विभागांनी व्यक्त केला होता. ULFA सारख्या संघटनांना संरक्षण, अर्थपुरवठा आणि पाठींबा देणाऱ्या गटांना भारताने ही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत “दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स” धोरण घेतले आहे. या धोरणाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. सीमारेषेपार कारवाया करणाऱ्या संघटनांवर भारत आता केवळ निषेध करत नाही, तर थेट कारवाई करतो हे या ऑपरेशनने सिद्ध केले आहे.

पूर्वोत्तर भारतात शांतता बिघडवण्याचा कट रचणाऱ्या संघटनांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांतर्गत दलालांवरही या कारवाईने मोठा धक्का बसला आहे. म्यानमारच्या सीमेपलीकडून घुसखोरी, प्रशिक्षण शिबिरे आणि हल्ल्याचे कट रचले जात होते. भारताने त्याचा पुराव्यानिशी शोध घेत अचूक वेळ साधून प्रत्युत्तर दिले

या हल्ल्यामुळे भारताने जागतिक स्तरावरही स्पष्ट संदेश दिला आहे . भारताच्या सीमांचं संरक्षण हे फक्त संरक्षणात्मक नाही, तर ठोस आक्रमक धोरणावर आधारित आहे. भारत आता कुठल्याही स्वरूपाच्या अतिरेकी कृत्यांना प्रतिकार देण्याच्या स्थितीत आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि विशेष कमांड फोर्स पूर्ण सज्ज आहेत.

ही कारवाई यशस्वी ठरली असली तरी यामागचा अर्थ फार व्यापक आहे. मोदी सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही दबावाला किंवा राजकीय बळाला ते भीक घालत नाहीत. या ऑपरेशनमुळे भारतातील ‘चिनी एजंट’सदृश विचार पसरवणाऱ्या गटांनाही जबरदस्त संदेश मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *