विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या जागतिकतेला औपचारिक स्वरूपात प्रतिष्ठा लाभली आहे. हा गौरव संपूर्ण देशासाठी आणि मराठी जनतेसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
( The inclusion of Chhatrapati Shivaji Maharaj 12 forts in the World Heritage Sites is a a matter of pride for the Marathi peopleChief Minister Devendra Fadnavis stated at the dutyfulfillment ceremony.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या पुढाकारने कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीमती उषाताई मंगेशकर, कौशल विकास, नाविन्यता व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, कॅप्टन रवी सेल्वन, प्रसाद लाड, अमित साटम, संजय उपाध्याय, सुनील राणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आलेल्या १२ किल्ल्यांच्या नामांकनाला केंद्र शासनाने प्राधान्य दिले आणि युनेस्कोसमोर १२ किल्ल्यांची अधिकृत शिफारस केली. देशभरातून विविध राज्यांनी अनेक स्थळे सुचवली होती, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांनीच भारताचे प्रतिनिधित्व करावे, याबाबत आग्रही होते. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुढाकार घेतला. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विद्यमान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे विशेष कौतुक केले. “आशिषजींनी हे तांत्रिक सादरीकरण पॅरिसमध्ये जाऊन केले आणि युनेस्कोच्या अधिकाऱ्यांसमोर किल्ल्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या आणि सर्व टीमच्या योगदानामुळेच हा गौरव शक्य झाला.
किल्ल्यांच्या स्थापत्यकलेचे विविध पैलू उलगडत त्यांचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर स्वराज्याचे आधारस्तंभ आहेत. या जलदुर्गांचं बांधकाम त्या काळात किती कठीण होते, हे आजही समजून घेणे कठीण आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात ३२ लाख किलो चुना आणि १० लाख किलो लोखंड वापरण्यात आले. यावरून महाराजांच्या दूरदृष्टीची आणि प्रशासनिक कौशल्याची प्रचिती येते.
राज्यकारभारातील किल्ल्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले, दुर्ग म्हणजे राज्याचा आधार. छत्रपती शिवाजी महाराज यांचे म्हणणे होते की, ३६३ किल्ल्यांचे संरक्षण करताना कोणतीही साम्राज्य शक्ती हे स्वराज्य ताब्यात घेऊ शकणार नाही.
या गौरवप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना,मुख्यमंत्री म्हणाले, या यशामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे.
