मराठा आंदोलनावर न्यायालयाची कठोर भूमिका, मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबविण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम काय असतील, तुम्हाला माहित आहे का, तुम्ही नियमांचे पालन करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे. नियम-अटी पालन करताना कठोर व्हावे लागले तरी चालेल. मुंबईच्या बाहेरून जे आंदोलक येत आहेत, त्यांना बाहेरच थांबवा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
( Court takes a tough stand on Maratha agitationorders to stop protesters coming from outside Mumbai)

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी झाली. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाला देण्यात आलेली परवानगी रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोर्टाने 5 हजार लोकांसोबत आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, पण प्रत्यक्षात त्यांच्यासोबत हजारो लोक आलेत. परिणामी, कोर्टाच्या अटीशर्तींचे उल्लंघन होत असल्यामुळे कोर्टाने या आंदोलनाला दिलेली परवानगी मागे घ्यावी, असा युक्तिवाद सदावर्तेंनी या प्रकरणी केला आहे.

सात दिवसांच्या गणपतीचे उद्या विसर्जन आहे. त्यामुळे अधिक गर्दी असते, असे महाधिवक्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या, त्याची अंमलबजावणी होईल, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मनोज जरांगे, वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या. नियम आणि अटी यांचे उल्लंघन होत असल्याचे कळवा, असे कोर्ट म्हणाले. ती नोटीस तुम्ही देऊ शकता का, असा सवाल कोर्टाने केला आहे. कोर्टात महाधिवक्ते म्हणाले की,आझाद मैदानात तंबू उभारले जात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत कुठल्याही बळाचा वापर केला नाही. मात्र, हायकोर्टाच्या निर्देशाचे उल्लंघन झाले. मुंबई पोलिसांची निम्म्याहून अधिक यंत्रणा आंदोलनात व्यस्त आहे. गणेशोत्सवात पोलिसांना अधिकचा ताण आहे.

महिला पोलिस अधिकारी पाया पडतात. माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचे आहे, असे सदावर्ते म्हणाले. त्यावर दोन दिवसांत नियमांचे पालन होईल, याची खात्री घेता का, असा सवाल कोर्टाने केला. तेव्हा आम्ही फक्त अपील करू शकतो, असे उत्तर आंदोलकांच्या वकिलांनी दिले. तेव्हा उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असे कोर्ट म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *