मराठा आंदोलनाला यश, मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.
( Maratha reservation movement a success Manoj Jarange ends hunger strike)

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी
मनोज जरांगेंनी सलग 5 दिवस उपोषण केले. त्याचा फटका त्यांच्या प्रकृतीला बसला. आता उपोषण सोडल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासाठी एक विशेष रुग्णवाहिका आंदोलनस्थळी आझाद मैदानावर दाखल झाली होती. उपचार झाल्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे आंतरवाली सराटीकडे रवाना होतील.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना लिंबू सरबत पाजले. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मराठा बांधवांनी व्यासपीठावर जरांगेंवर विजयाचा गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला.
आमचे सरकार सोबतचे वैर संपले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनी येथे येऊन आमचे उपोषण सोडवावे, असे जरांगे म्हणाले. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना प्रथम उपोषण सोडण्याची विनंती केली. हे तिघेही बाहेर असल्यामुळे ते येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी फटाकेही फोडले जात आहेत. आझाद मैदानासह मुंबईत विविध ठिकाणी हे चित्र आहे. दरम्यान, जीआरमध्ये शासकीय भाषा असते. त्यामुळे मनोज जरांगे यांचे वकील त्यांना सरकारच्या जीआरमधील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *