विशेष प्रतिनिधी
मुंबई : जोपर्यंत आमचे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
( As Long as We Govern OBCs Will Face No InjusticeCM Devendra Fadnavis)
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आठपैकी सहा मागण्या केल्या आहेत. यामुळे ओबीसी नेते, आंदोलक आणि समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. ओबीसी नेते आणि मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ यांनी तर मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
जेएनपोर्ट – पीएसए मुंबई टर्मिनल फेज – 2 च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भुजबळ कॅबिनेटमधून कुठेही निघून घेले नाहीत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना आश्वस्त केले आहे. जो जीआर काढलेला आहे. त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. फक्त मराठवाड्यामध्ये निजामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रजांच्या राज्याचे पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाड्यात मिळत नाहीत. त्यामुळे निजामाचे पुरावे आपण ग्राह्य धरले आहेत. जे खरे कुणबी आहेत. त्यांनाच हा लाभ मिळेल. जे खरे हक्कदार आहे, त्यांनाच त्याचा फायदा होईल. यामध्ये कुणालाही खोटेपणा करता येणार नाही. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी या जीआरचे स्वागतही केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्याप्रमाणे ओबीसी संघटनांची शंका दूर करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भुजबळ आणि इतरांच्या मनातील शंका आम्ही दूर करु. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचे काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्याचे मराठ्यांना तर ओबीसींचे ओबीसींना देणार आणि खरा अधिकार ज्याचा त्यांना देणार. दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही,
मराठा समाजाचे आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेकवेळा समजुती-गैरसमजुती होतात. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे आमचे ब्रीदवाक्य आहे.
