दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये हाय अलर्ट; शहरभर सुरक्षा व्यवस्था कडक

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 13 जण ठार, तर 24 जखमी झाल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात हाय अलर्ट घोषित केला आहे. शहरातील बसस्थानके, हॉटेल्स, लॉज, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ( High alert in Pune Pimpri-Chinchwad after Delhi blasts Security tightened across the city)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील संवेदनशील भागांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलीस पथके सार्वजनिक ठिकाणांची तपासणी आणि गस्त वाढवत आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांकडून कडक तपासणी आणि प्रवाशांच्या सामानांची चौकशी सुरू आहे. तर पुणे विमानतळावरही सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून स्थानिक पोलिसांसोबत समन्वयाने तपासणी केली जात आहे.

शहराच्या सीमेवरील प्रवेश व निर्गम मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयास्पद वाहनं आणि व्यक्तींची कागदपत्रे तपासून पडताळणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही कडक सुरक्षा

दिल्लीतील घटनेनंतर गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानेही हाय अलर्ट जारी केला आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, वाकड आणि हिंजवडी या परिसरात पोलिसांची गस्त आणि उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

शहरातील बाजारपेठा, मॉल्स, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस तपासणी सुरू आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी सीमावर्ती भागात गस्त आणि नाकाबंदी वाढवली असून, महिला पोलिस अधिकारीही सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा तपासणीमध्ये सहभागी आहेत.

व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची खात्री करून घेतली असून, शाळा आणि महाविद्यालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, गुलटेकडी मार्केट यार्डातील एका ट्रकचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार केली असून सुरक्षेच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पोलीस आयुक्त विनीत चौबे यांचे आवाहन

> “नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या पुण्यात कोणताही धोका नाही, मात्र दिल्लीतील घटनेनंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरक्षा वाढवली आहे. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.”
— विनीत कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

दिल्ली स्फोटात 13 जणांचा मृत्यू

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आय-20 कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू, तर 24 जखमी झाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, हा स्फोट कारच्या मागील भागात झाला. घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

या घटनेनंतर दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य समन्वित दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज, नागरिकांना घाबरू नका, पण सतर्क राहा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *