महाविकास आघाडीतून खुद्दार बाहेर पडले,गद्दार खाली पडले, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

नाशिक : महाराष्ट्रात 2019 साली लोकमताचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून गद्दाराचं सरकार स्थापन झाले होते. त्यामधून खुद्दार बाहेर पडले. आपल्यासोबत आले. गद्दार खाली पडले. म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची अडीच वर्षे वाया गेली. महाराष्ट्राच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची संधी त्यांनी घालवली. स्वतःचे घर भरण्यापलीकडे त्यांनी कधीच काही पाहिले नाही. आपल्याला अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपण सगळे मिळून विकासाची ट्वेन्टी-ट्वेन्टी मॅच सुरु केली आहे. बॅटिंग सुरू असून २०२४ मध्ये विजय मिळवूनच ही बॅटिंग संपवणार आहोत.

महाराष्ट्रातील सरकार खुद्दारांचे असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्रात जे सरकार आले आहे ते गद्दारांचे नाही तर खुद्दारांचे सरकार आहे. जनतेसाठी ज्यांची खुद्दारी आहे, हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, विचारांसाठी ज्यांची खुद्दारी आहे अशा खुद्दारांचे हे सरकार आहे. गद्दारांचे सरकार तर ते होते जे २०१९ साली लोकांनी दिलेल्या मतांचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाले होते. त्या गद्दारांच्या सरकारमधून खुद्दार बाहेर पडले, खुद्दारांनी आपल्या सोबत येऊन सरकार स्थापन केले.

फडणवीस म्हणाले, भाजपाच्या प्रवासात काही शहरांची आपली भूमिका आहे. काही शहरे ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत. आपल्यासाठी पुण्यभूमी सम आहेत. त्यातलेच एक शहर म्हणजे नाशिक आहे. येथे संकल्प घेतला की त्याच्या पूर्तते करता प्रत्यक्ष प्रभू श्रीराम यांचाच आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्याला कल्पना आहे की येथेच शूर्पणखेचे नाक कापून असुरी शक्तीचा अहंकार संपवण्यात आला होता. या देशात ज्यांना अहंकार होता, अशांचा अहंकार संपवण्याचे काम हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात २०१४ पासून होत आहे. सामान्य माणसाचे सरकार काय असते हे सर्वांना पाहायला मिळत आहे.