नाकाखालून 40 जण निघून घेल्याची निराशा खेडमधील सभेत दिसली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर निशाणा साधलाय. सगळं चोराल पण शिवसेना चोरू शकणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केलीय. त्याचवेळी भाजपवरही जोरदार टीका केलीय. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं,असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. नाकाखालून 40 जण निघून घेल्याची निराशा खेडमधील सभेत दिसल्याची टीकाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलीय.

उद्धव ठाकरे यांची रविवारी खेड येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत भाजपवरील टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, तेच शब्द, तिच वाक्य, तेच टोमणे या व्यतिरिक्त काहीही नवीन यांच्याकडं नाही, खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा तसेच त्यांच्या भाषणात हताशपणाही दिसून येत होता. त्यामुळं अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर काहीही प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस भिवंडीत गेले होते.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषकाचं भव्य आयोजनही करण्यात आलं होतं. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सरकारच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेचा केक तयार केला होता. हा केक कापून मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर भन्नाट अशी फलंदाजी देखील केली.