मुंबई बदलत असून ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुंबई मेटाव्हर्स’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सौरव विजय, ‘एमएम आरडीए’चे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे तसेच मुंबई मेटाव्हर्स’चे सदस्य उपस्थित होते.
मुंबईतील विविध विकास प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ते दृश्य स्वरूपात कसे असतील, त्यांचा एकत्रित परिणाम कसा असेल याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबई बदलते आहे. मुंबई महानगराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि संपूर्ण मुंबई अधिक दर्शनीय करण्याच्या दृष्टीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई साकारायची आहे. यातील अनेक प्रकल्प आकारास येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल व याव्दारे नागरिकही विकासकामांत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागरिकांनाही याचा अनुभव घेता येईल यादृष्टीने प्रकल्पाची आखणी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
