आज जगभरामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिल्यापासून दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. भारतामध्येही अगदी स्थानिक पातळीपासून ते कार्यालयांमध्येही महिला दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. आज महिला जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सक्रीय असल्याचं दिसून येतं. असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांनी एका क्षेत्रात अधिक प्रमाणात प्रवेश करणं हे राज्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल असं म्हटलं आहे. महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ही इच्छा व्यक्त केली आहे.
“आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा,” असं म्हणत राज यांनी आपल्या पत्राला सुरुवात केली आहे. “सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे,” असं म्हणत राज यांनी 21 व्या शतकात महिलांच्या बदलेल्या विचारसणीचं कौतुक केलं आहे.
१००,१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.
म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

