संजय राऊत म्हणतात, मी विधिमंडळाचा अवमान केला नाही

मुंबई : हक्कभंग होईल असे काहीही विधान मी केलेले नाही. एका विशिष्ट गटापुरतं हे विधान मर्यादित होतं. त्यामुळे मी विधिमंडळाचा अवमान केला नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, मला हक्कभंगाची नोटीस मिळाली. त्यावेळी मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. आता अधिवेशन सुरू झालेल आहे. विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि कशा प्रकारे काय प्रोसेस आहे ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देऊ. त्या विशिष्ट गटासंदर्भात तो शब्द वापरला.

चोर हा अतिशय योग्य शब्द आहे. मी विधिमंडळाचा अवमान केला नाही. राऊत म्हणाले, या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही घाबरत नाही. या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं. तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालूप्रसाद यादव यांच्यावर धाडी पडल्या. पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही. धाडी कोणावर टाकत आहेत तर विरोधी पक्षावर. जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, त्यांनीच भांग पाजली का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे.