भोपाळ: परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना देशातून हाकलून द्या, अशी मागणी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. परदेशात बसून राहुल सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. त्यांना आता राजकारणात संधी देऊ नये. देशाबाहेर हाकलले पाहिजे.
संसदेत चांगले काम सुरू आहे. सर्व काही ठीक आहे, पण काँग्रेसचे लोक सरकार चालू देत नाहीत. संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही. संसद चालली तर आणखी कामे होतील, असे त्यांना वाटते. कामे जास्त झाली तर आपले अस्तित्व टिकणार नाही. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्यांची बुद्धिमत्तादेखील दूषित होत आहे. तुम्ही या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात, असे त्यांनी सुनावले.
साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, तुम्ही भारतातील नाहीत, आम्ही मान्य केले, कारण तुमच्या मातोश्री इटलीच्या आहेत. हे आम्ही नाही म्हणालो, चाणक्याने म्हटले आहे की, परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. संसदेने आणि भारतातील जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिल्यामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे सरकार इतकी वर्षे होते. तुम्ही देश उद्ध्वस्त केलात. संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, असे तुम्ही विदेशात म्हणता. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. मला अशा राहुल गांधींचा तिरस्कार आहे.
