माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत खानदानी दुष्मनीअसल्याचे शरद पवार यांनी आत्मचरित्रात सुचित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपलं पहिलं लक्ष्य मानण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली, असे पवार म्हणतात.
लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयीची नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे वडील आनंदराव आणि आई प्रेमलाकाकी चव्हाण यांच्याशी आपले सूर कधीच जुळले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.शरद पवार म्हणतात, पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव आणि आई प्रेमलाताई यांचा सांधा यशवंतराव चव्हाणसाहेब यांना मानणाऱ्यांशी फारसा कधीच जुळला नव्हता. चव्हाणसाहेबांशी सहमत नसलेल्यांसमवेत त्यांचा घरोबा अधिक होता. चव्हाणसाहेबांचं आणि माझं सौहार्दाचं नातं सर्वश्रुत आहे. त्याच्या परिणामी माझ्यासमवेतही पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीयांचे सूर फारसे कधी जुळलेले नव्हते.
दिल्लीतल्या कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कलानं चालणारे, अशीच पृथ्वीराज चव्हाण कुटुंबीयांची ओळख होती. त्यांची काँग्रेस श्रेष्ठींसमवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करू शकेल, अशी आम्हाला साधार भीती होती. सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना बरोबर घेत कारभार हाकताहेत, असं दिसत होतं. आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या त्यांच्या सूत्राबद्दल आम्हाला प्रत्यवाय नव्हता. आमची हरकत असायचंही काही कारण नव्हतं आणि त्यात काही वावगंही नव्हतं. मात्र थोड्याच दिवसांत या भूमिकेत वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरलीही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला मित्रपक्ष आहे, या भूमिकेत थोडं अंतर पडायला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपलं पहिलं लक्ष्य मानण्याची पृथ्वीराज चव्हाण य वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली असा आरोप पवारांनी केला आहे. मंत्रिमंडळ एकोप्याच्या वातावरणाला तडा जाऊन, दोन तट पडल्यासारखं झालं होते. राष्ट्रवादीचे सारे मंत्री अस्वस्थ होतेच, परंतु पक्षसंघटनेतही चलबिचल होती.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी बोलताना हाताला लकवा भरला आहे का असे पवार म्हणाले होते. त्या संदर्भात तुम्ही पवार म्हणतात, प्रशासन गतिमान होण्याऐवजी थंडावलं होतं. निर्णयप्रक्रिया मंदावली होती. फायलींच्या अपेक्षित निपटाऱ्याला गती येत नव्हती. विधानसभा निवडणुक सामोरं जाताना प्रशासनाची ही कूर्मगती उत्साहावर पाणी ओतणारी होती. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्रिपदी असताना सरकारचा कारभार उत्तम आणि समन्वयानं चाललेला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी कसे केले नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
