दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रामबाई बैस, संस्थेचे चेअरमन पद्मश्री प्रतापराव पवार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवर,संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, बाल कल्याण संस्था दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी चांगले कार्य करणारी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणारी आहे. ही संस्था मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत आहे. दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि विकास ही शासन किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी सहकार्य करावे.

बाल कल्याण संस्थेला भेट देऊन आनंद झाल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, बाल कल्याण संस्थेला राजभवनाची जागा घेण्याचा त्या काळात घेण्यात आलेला निर्णय दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात महत्वाचा ठरला आहे. संस्थेत मुलांना गीत, संगीत, शिल्पकला, संगणक, नृत्य, खेळ अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेचे कार्य लक्षात घेता संस्था समाजाच्या कौतुकास पात्र असून संस्थेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दिव्यांग मुलांना ईश्वराने वेगळी शक्ती प्रदान केली असून त्याआधारे ही मुले आपले विश्व घडवितात. त्यांना दयेची नव्हे तर आशीर्वाद आणि प्रोत्साहनची गरज आहे. त्यांना प्रेम दिल्यास ते चांगले यश संपादन करू शकतात असे सांगून इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे असे रमेश बैस म्हणाले. याच भावनेतून प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कल्याण संस्था चांगली प्रगती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.