‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात,घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत होईल असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी आयोजित नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी यात ग्रामीण भागातून ३५१ आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे ३६ असे राज्यातून एकूण ३८७ कलश पाठवण्यात येणार आहेत.
या कलशासाठी माती किंवा तांदुळ संकलनाची मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अमृत कलश यात्रेबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या अमृत कलश यात्रेच्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच यात्रेतील विविध टप्प्यांची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण माझी माती –माझा देशमधील पहिला टप्पा यशस्वी केला आहे. यात वीरांची नावे असलेले शिलाफलक लावले, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण केलं, पंचप्रण शपथही घेतली आहे. अमृत कलश यात्रा चार टप्प्यात पार पडणार आहे. चारही टप्पे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्यावे व त्यादृष्टीने सर्व प्रशासनातील सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही. तर अतिशय गांभीर्याने आणि देशभक्तीची भावना घेऊन अमृत कलश यात्रेत आपला सहभाग द्यायचा आहे. आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत या यात्रेत मनापासून आणि उत्स्फुर्तपणे आपल्याला काम करायचे आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, आपल्या भागातील प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना अमृत कलश यात्रेबाबत व्यवस्थित जबाबदारी द्या. प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक, विद्यार्थी या सगळ्यांचा सहभाग कसा मिळेल यासाठी नियोजन करा.मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभाग तसेच माझ्या सचिवालयातून सुद्धा यावर सनियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
आता उत्सव आणि सणवारांचे दिवस येणार आहेत. त्यांचा उपयोग करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची ही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांनी जागतिकस्तरावरीही आपल्या देशाचा नाव लौकीक वाढेल असे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्याची ही संधी आहे. त्यामुळे हा अमृत कलश यात्रेच्या नियोजनातही महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
