मोदींच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केल्याने ठाकरेंचा जळगावात जळफळाट – चित्रा वाघ

आता इंडिया नाव बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदूस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वत:चे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदलणार असा हल्लाबोल नामांतराच्या वादावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जळगावच्या सभेतून केला होता. त्यांच्या या टीकेला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की उद्धवजी, अहो किती रडताय.. प्रत्येक ठिकाणी पुन्हा तेच रडगाणं सुरूय. इकडे संपूर्ण जगानं मोदींचं नेतृत्वांवर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे तुमचा झालेला जळफळाट जळगावच्या सभेत दिसला.त्या पुढं म्हणाल्या की होय, देशाचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा पुढे नेत पंतप्रधान मोदी यांनी कश्मीर 370 हटवण्याचा निर्णय घेतला. जे 70 वर्षात कोणी करू शकलं नाही ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवलं. पोलादी पुरूषाचं हे लक्षण आहे. हा आहे पुरूषार्थ.

”तुमचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात आहे…तुमचा पुरूषार्थ पत्राचाळीतील भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालण्यात आहे…तुमचा पुरूषार्थ महापालिका लुटण्यात आहे…तुमचा पुरूषार्थ मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आहे…तुमच्या पुरूषार्थाच्या कथांची यादी न संपणारी आहे, उद्धवजी”….!अशी सरबत्ती वाघांनी ठाकरेंवर केली.