आतंकवाद्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे मत मागत आहेत – आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरे आरोपी आतंकवाद्यांच्या मदतीने मत मागत आहेत,’ असा आरोप केला.

आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले, “मुंबईकर मोदींच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांच्या मागे समर्थन देत आहेत. पण नागरिकांच्या समर्थनावर जणू काही निवडणूक लढवायचीच नाही असा निर्णय आणि असे मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचे आणि विशेषतः उबाठा सेना दिसत आहे. कसाबचे उदात्तीकरण करत तुष्टीकरण करण्यात काँग्रेस कमी पडलं की काय, आता उबाठा सेना व उद्धव ठाकरे तुम्हाला सवाल आहे; तुम्ही तर काँग्रेसच्याही वर गेलात.”

पुढे ते म्हणाले, काँग्रेसने कसाबच समर्थन केलं, तुम्ही तर बॉम्बब्लास्टचा आरोपी असलेला बाबा चौहान इकबाल मुसा ज्याला दोष सिद्ध होऊन शिक्षा झालेली आहे, मुंबईकरांचा त्याने जीव घेतला आहे, असं न्यायालयाने सांगितलं आहे. अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचा उमेदवार मतदारांसमोर जात आहे. याचा अर्थ दोष सिद्ध आरोपी आतंकवादाच्या मदतीने उद्धव ठाकरे तुम्ही मत मागत आहात. मुंबईकरांना तुम्ही कसं संरक्षण देणार? आतंकवादाच्या विरोधात एकत्र या, मुंबईच्या योद्धांच्या बाजूने एकत्र या, असे मी आवाहन करतो. या उबाठा सेनेला आणि काँग्रेसला दंडित करा.

शिवसेना उबाथ गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या रॅलीमध्ये १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याच्या आरोप भाजपने केला आहे. यावर अमोल कीर्तिकर यांनी प्रत्युत्तर देत ‘भाजपकडे आता बोलण्यासारखं काही नाही. गेल्या १० वर्षात काही काम न केल्यामुळे ते आता मूळ मुद्दे सोडून काहीतरी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत.