बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला, तर उपोषण पुढे ढकलावे अशी विनंती आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांना केली आहे. ( Will meets the Chief Minister and settles the demands, Postpone the hunger strike, MLA Suresh Dhas’ request to the Massajog villagers)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्यानं धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा नंतर कुणाचेही ऐकणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी देत आठ मागण्या ठेवल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर धस यांनी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली.
धस म्हणाले, देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे. एसआयटीमध्ये सायबर सेलच्या दोन तज्ज्ञांनी नियुक्ती व्हावी, यावर सोमवारपर्यंत आदेश येतील. 6 डिसेंबर आणि 9 डिसेंबरच्या घटनेपुरते मर्यादित न राहता, घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी पवनचक्की कंपनीतील शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते, त्यांनी फिर्याद दिली होती. तेव्हापासूनचे सीडीआर तपासले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे दोन अधिकारी नेमण्याची विनंती केली आहे. पोलीस अधिकारी महाजन हे बीडला आहे. तो तिथून येऊन केज पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतो. तो महाजन इथे कसे काय बसतो, त्याचा काय संबंध? त्यामुळे सहआरोपी म्हणून महाजन आणि राजेश पाटील, या दोघांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.
फरार कृष्णा आंधळेला तातडीने अटक करणे गरजेचे आहे. आंधळे हा फार चतूर आहे. त्याचे बगलबच्चे जर एकाला मारहाण करू शकतात. त्यामुळे आंधळेला अटक होणे गरजेचे आहे. त्यासह वाशी पोलीस ठाण्याचे रमेश घुले, पोलीस कर्मचारी दिलीप गीते, गोरख फड, दत्ता बिक्कड यांचे सीडीआर तपासावेत आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसे आणि त्याच्या पत्नीने पैसे पाठवले आणि त्या सरकारी वकील होत्या. यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी यासंदर्भात पत्र दिले आहे,” असे धस यांनी सांगितले.
“सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती प्रक्रियेत आहे. त्यात काय अडचण आहे, का थांबली आहे, याबद्दल धनंजय देशमुख यांना खासगीमध्ये माहिती दिली आहे. जलदगती न्यायालयात प्रकरणाची सुनावणी होण्याची मागणी आहे. संतोष देशमुख यांचा मृतदेह बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर तो केजच्या शासकीय रुग्णालयात आणणे अपेक्षित होते. पण, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याने ही गाडी कळंबच्या दिशेने नेली होती. मात्र, पाठीमागे गाडी आल्याचे बघून पुन्हा गाडी वळवली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. कारण पाटील हा यात स्पष्टपणे आरोपी असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत हा आतमध्ये जायला पाहिजे होता, अशी ग्रामस्थांची मागणी आहे,” अशी माहिती धस यांनी दिली.