विशेष प्रतिनिधी
नागपूर: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्ये हिंसाचार झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून लावण्यात आलेली संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे. (Curfew in Nagpur completely lifted)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचारातील दंगलखोरांना कडक शब्दांत इशारा दिला होता. नुकसान वसूल करण्यासाठी संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. काल मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
17 मार्चच्या रात्री दोन गटात हिंसाचार झाला होता. एक जणाचा मृत्यू झाला होता. 20 दुचाकी, 40 चारचाकीचे आणि 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आली होती.
नागपूर शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. संचारबंदी लावल्याने हिंसाचार ग्रस्त भागात पोलीस बंदोबस्तामुळे वर्दळ थांबली होती. परंतु आता शहर पूर्वपदावर येत आहे. नागपुरात बाजारपेठही सुरु झाली आहे. वर्दळ सामान्य होऊ लागली आहे. नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवली असली तरी परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष आहे.
