राहुल गांधींनी एकदा तरी त्या सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे. त्यांचा अपमाण राहुल गांधी यांनी केला आहे. असे म्हणत राहुल गांधींनी एकदा तरी सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधासभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

“विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. आम्ही फार संयम ठेवला. कोणीही मर्यादा ओलांडण्याची गरज नाही, त्याची एक सीमा असते. आम्ही फक्त एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असा आरोप आमच्यावर करण्यात आला. सावकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी करत आहेत. आजही त्यांनी अपमान केला आहे. सावरकर हे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं दैवत आहे. ज्या मरणयातना त्यांनी भोगल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतक्या हालअपेष्टा सोसल्या. राहुल गांधींनी एक दिवस सेल्यूलर जेमध्ये जाऊन राहावं. अर्ध्या एका तासासाठी घाण्याला जुंपल्यानंतर त्यांना त्यांच्या काय वेदना आहेत त्या कळेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

खासदारकी रद्द झाल्यानंतर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली त्याबद्दल माफी मागायला ‘मी सावरकर नाही’, असं ते म्हणाले आहेत. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. तुम्ही सावरकरांना काय समजता? यांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे.”