20 जून दिवस होता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा सगळेच पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या विजयात दंग होते. याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशी घटना घडत होती. शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड केलं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडीचा भाग असणारे, ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे स्वपक्षाचे नेते, आमदार आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे राहिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना आजच्या ठाकरे गटाच्या गद्दार दिनाबाबत विचारले. त्यावर बोलताना विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. विखे म्हणाले, गद्दार दिनाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी करणे म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ज्या भारतीय जनता पक्षाशी युती करून तुम्ही पाच वर्षे राज्यात सत्ता भोगली.
भाजपसोबत युती करून नंतर विधासभेच्या निवडणुका लढवल्या म्हणून तुमचे किमान 50 आमदार तरी निवडून आले. त्याच भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेच्या लाचारीसाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला काहीच जनाधार नव्हता त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय केलात. खरं म्हणजे गद्दारी कुणी केली? आता वर्धापनदिन साजरा करत आहेत तर स्वतःचा गद्दार दिन साजरा करतात का, याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, अशी टीका विखे यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली का?
शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ते वागले नाहीत. ते शंभर टक्के राजकारण करतात. त्यांनी गद्दार दिन जरूर साजरा केला पाहिजे कारण, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली. हळूहळू बंडाचे खरे स्वरुप लोकांसमोर येत आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
