राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसीत भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधा प्रकल्पांसह आर्थिक प्रगतीचे संकप्लाचाही यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यांनी हा जाहीरनामा केलेला आहे. दिलीप वळसे पाटील पुण्यात उपचार घेत आहेत. तरीही त्यांनी हा जाहीरनामा करत असताना या समितीला सतत मार्गदर्शन केलं. त्यांनी एक चांगला जाहीरानामा पक्षासाठी तयार केला आहे. त्याबद्दल त्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले तरीही जागावाटप आणि जाहीरनामा प्रसिद्ध झाला नव्हता.अशातच आज (२२ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं या जाहीनाम्यात म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न केला आहे. जातनिहाय जनगणनेसाठी आम्ही आग्रही आहोत हा मुद्दा या जाहीरनाम्यात आहे. तसंच राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रीसाठी आजची लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. तसंच, या जाहीरनाम्याच कृषी, वीज, उद्योग अशा विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा
महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा ही देखील मागणी असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोलाची भूमिका बजावणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देत आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. आता यासाठी राष्ट्रावादीने प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात म्हटले आहे.राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही महत्त दिले आहे. जाहिरनाम्यात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी पक्षाची भूमिका आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एनडीएचा विश्वासक चेहरा आहेत. विरोधकांकडे तसा एकही चेहरा नाही. महाराष्ट्रात मतदानाचा टक्का कमी झालाय. पण उन्हामुळे ते झालं आहे. मतदान यादीत नाव नसल्याने हे झालं आहे. आम्ही महायुतीत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. सबका साथ सबका विकास यावर राष्ट्रवादीचा विश्वास आहे.’, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यातील प्रमुख मुद्दे
80 कोटी नागरिकांना मोफत रेशन.
चार कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे.
मुद्रा योजनेचा 46 कोटी लोकांना लाभ.
पीएम सूर्यघर योजनेतून मोफत वीज.
शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे.
महाराष्ट्राला कौशल्य विकासाचे केंद्र बनवणे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार
यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावा
शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थितपणे असली पाहिजे.
अपारंपारिक वीज निर्मितीला प्राधान्य देणार
कृषीपीक विम्याला व्याप्तीत वाढ
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा
