हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, भारतीय लष्कराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले काैतुक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय सैन्यांची ताकद काय आहे? हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दाखवून दिले आहे. “हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे और ना थकेंगे, अशा प्रकारची भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्वांना कळली असेल, अशा शब्दांत लष्कराचे काैतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. (Hum Na Zhukenge Na Rukenge Chief Minister of Indian Army Devendra Fadnavis made a speech)

पहलगाम हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. भारताने जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे पाकिस्तानने दाती तृण धरत शरण येत शस्रसंधीची घोषणा केली. भारतीय सेनेने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिल्याच्या पार्श्भूमीवर भाजपाकडून देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदनात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सेनेचं कौतुक केलं.

सुन ले बेटा पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या देशातील सैन्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. भारतीय सैन्यांची ताकद काय आहे? हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दाखवून दिले आहे. “हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे और ना थकेंगे, अशा प्रकारची भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्वांना कळली असेल,

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 27 पर्यटकांना ज्या पद्धतीने मारलं, धर्म विचारून मारलं, पत्नीसमोर पतीला मारलं, मुलासमोर वडिलांना मारलं. अशा प्रकारचं हत्याकांड भारताच्या नाही तर जगाच्या इतिहासात अलिकडे आपल्याला कधी पाहायाला मिळाले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर देणार असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी “ऑपरेशन सिंदूर” राबवलं आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं. आमच्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला, असे फडणवीस म्हणाले.

भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घूसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने ज्या 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्या ठिकाणी भारतीय सेना कधीच पोहचणार नाही, असं पाकिस्तानला वाटायचं. मात्र, तिथेच जाऊन भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं की दहशतवादी कुठेही लपले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. कारण भारताने पुन्हा दाखवून दिलं की, आपली डिफेन्स सिस्टीम किती मजबूत आहे. या माध्यमातून भारतीय सैन्यांची ताकद जगाने पाहिली. पाकिस्तानला भारतापुढे गुडघे टेकावे लागले आणि मग शस्त्रसंधी झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.